अकोला : दिवाळी सणात प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर भाडेवाढ ७ नोव्हेंबरचे मध्यरात्री पासून २७ नोव्हेंबर पर्यंत शिवनेरी, ई- शिवनेरी, शिवाई, अश्वमेध, परिवर्तन (लालपरी), हिरकणी, शितल, विनावातानुकूलीत शयनयान, आसनी या सर्व श्रेणीला लागू राहील. त्यामुळे यंदा दिवाळीसाठी प्रवास करणार्यांना मोठी आर्थिक फटका बसणार आहे.
धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज तसेच या काळात शाळा- महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे मोठ्या संख्येने लोक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करतात. सणासुदी दरम्यान खाजगी ट्रॅव्हल एजन्सी प्रचंड भाडेवाढ करून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करतात. अशातच महामंडळाने हंगामी भाडेवाढीचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे.
राज्य परिवहन महामंडळाने दिवाळी दरम्यान हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय रद्द करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा अकोलाचे प्रवासी ग्राहक संघ प्रमुख दीपक वैष्णव यांनी केली असल्याचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर, मिलिंद गायकवाड व देवानंद गहीले यांनी कळवले आहे.