यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याच्या कलावती बांदूरकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खोटं पाडलं आहे. अमित शहा यांनी कलावती यांच्याबाबत जे विधान केलं, त्याला प्रत्युत्तर देताना कलावती यांनी मला भाजपमुळे-मोदी सरकारमुळे काहीच मिळालं नाही. राहुल गांधी यांच्यामुळेच माझं आयुष्य बदललं, असं सांगतानाच अमित शाह यांच्या आरोपांमधली हवाच काढून घेतली.
यवतमाळ जिल्ह्यातील कलावती बांदुरकर यांची भेट घेऊन राहुल गांधी यांनी कलावतींच्या समस्या सोडविल्या, असा दावा काँग्रेसने केला आहे. राहुल गांधी बुंदेलखंडातील कलावती नामक एका महिलेच्या घरी गेले. तिच्या वेदनांचे राजकारण केले. मात्र वीज, घर, शौचालय, धान्य आणि आरोग्य या सर्व सुविधा मोदी सरकारने उपलब्ध करून दिल्या, असा दावा अमित शहा यांनी संसदेत बोलताना केला. यवतमाळातील काँग्रेस नेत्यांनी मात्र बुंदेलखंडातील अशा कुठल्याही कलावतीला राहुल यांनी भेट दिली नसल्याचा दावा केला. यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील जळका येथे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कलावती बांदुरकर यांच्या घरी राहुल यांनी भेट दिली होती. यानंतर कलावती या प्रकाशझोतात आल्या. त्यांना भरीव मदत करण्यात आली. घर, वीज, पाणी आणि जगण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध केली. सुलभ शौचालयचे बिंदेश्वर पाठक यांनीही मदत केली होती, असेही स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांच्यामुळे मुळेच मला सन्मानाने जगता आले. त्याच काँग्रेसने मला सगळ्यात सुख सुविधा पुरविल्या आहे. मोदी सरकारने मला काहीही दिलं नाही. संसदेत जे कुणी बोलले ते खोटं बोलले, असं कलावती यांनी सांगितलं.