शिमला : भारताला हिंदुराष्ट्र करायचे असेल आणि अखंड भारताचे स्वप्न साकार करायचे असेल तर हिंदू समाजाने जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यावा, असे आवाहन महंत यती नरसिंहानंद यांनी केले.
हिमाचल प्रदेश येथे अखिल भारतीय संत परिषदेच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. संत परिषदेच्या प्रभारी साध्वी सत्यदेवानंद सरस्वती म्हणाल्या की, हिंदू बहुसंख्य असल्याने भारत हा लोकशाही देश आहे. हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील मुबारकपूर येथे संघटनेच्या तीन दिवसीय ‘धर्म संसद’च्या पहिल्या दिवशी दोघांनीही ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
हे ही वाचा : पाकवर हल्ला करा, मी सोबत आहे : तोगडिया; डॉ. प्रवीण तोगडिया यांचे सरसंघचालकांना आव्हान
नरसिंहानंद यांनी डिसेंबर २०२१ मध्ये हरिद्वार येथे झालेल्या धर्म संसदेत भडकाऊ भाषण केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. रविवारी दिल्लीतील बुरारी मैदानावर झालेल्या हिंदू महापंचायतीतही त्यांनी भाग घेतला. ईतर धर्माचा व्यक्ती पंतप्रधान झाल्यास २० वर्षांत ५० टक्के धर्मांतर होईल असे ते म्हणाले. दरम्यान नरसिंहानंद यांच्यासह काही जणांना हिमाचल पोलिसांनी भावना भडकाविणारे वक्तव्य न करण्याबाबत नोटीस बजावली आहे. उना जिल्ह्यातील आंब पोलिसांनी पोलिस कायद्याच्या कलम ६४ नुसार ही नोटीस बजावली आहे.