अकोला : ईपीएस ९५ पेन्शनरांनी ९ ऑगस्ट क्रांती दिनी गांधी जवाहर बाग येथे सकाळी १० ते दुपारी २ यावेळात आत्मक्लेश आंदोलन केले. आंदोलनात बहुसंख्य पेन्शनर उपस्थित होते.
आंदोलनाला मार्गदर्शन करताना शंककराव पाटील, अंबादासजी भरणे, संजीव मालोकार, व्ही.ए. देशमुख, एम.टी. इंगळे, रमेश गायकवाड, गोपाल मांडेकर यांनी भाजप सरकारने नऊ वर्षाच्या कार्यकाळात संघटनेच्या एकाही आंदोनलाची दखल न घेतल्याने या सरकारला धडा शिकविल्याशिवाय पर्याय नाही, असे सांगितले. त्यानंतर अध्यक्ष देवराव पाटील यांनी भाजप सरकारवर सडकून टिका केली. ते म्हणाले की, केंद्र सरकारने उद्योगपतींचे १४ लाख कोटींचे कर्ज माफ केले. आमदार, खासदार यांना एक वेळ निवडून आल्यावर आयुष्याभर भरपूर पेन्शन वाढवून दिली, परंतु पेंशनरांना तीन हजार रुपये पेंशन वाढ देण्यास सरकारने नकार दिला. त्यामुळे सरकारवर कामगार व कर्मचाऱ्यांचा रोष असून महात्मा गांधी यांच्या पुतळया समोर भाजपला मतदान करणार नाही, अशी सार्वजनिक शपथ यावेळी घेण्यात आली.
यावेळी नारायणराव अंधारे, पी.के. देशमुख, केशव कोठाळे, फुरंगे, घोगरे, ताले, चोरे, व इतरांची उपस्थिती होती. यावेळी बुलढाणा जिल्हा संघटनेच्या वतीने एम.टी. इंगळे यांनी देवराव पाटील यांना शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन जीवनगौरव पुरस्कार दिला.