नागपूर : महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात आगमन झाले. भारतीय जनता पक्षातर्फे विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
फडणवीस यांच्या स्वागतासाठी विजय रथ तयार करण्यात आला होता. या रथावर त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. परिणय फुके, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, खासदार विकास महात्मे, माजी आमदार सुधाकर देशमुख आदी भाजपचे इतर पदाधिकारी होते. विमानतळावरून त्यांची मिरवणूक निघाली.
‘नागपूरकरांनी मला पाच वेळा निवडून दिले. त्यांचे आभार’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘महाराष्ट्र आणि विदर्भाला आता चिंता करण्याची गरज नाही’, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या स्वागतासाठी केवळ नागपुरातीलच नव्हे तर अगदी शेवटच्या टोकावरील गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांतून देखील त्यांचे कार्यकर्ते विमानतळावर दाखल झाले होते. नंतर हे हजारो कार्यकर्ते विजयी मिरवणुकीत सहभागी झाले.