Home » राज्यपाल अ‍ॅक्शन मोडमध्ये, बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरविण्याचे आदेश

राज्यपाल अ‍ॅक्शन मोडमध्ये, बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरविण्याचे आदेश

by नवस्वराज
0 comment

मुंबई : करोनामुक्त झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक तसेच मुंबईचे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले असून सर्व बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवावी असे आदेश दिले आहेत.

या पत्रानंतर आता महाराष्ट्र पोलिसांना बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवावी लागणार आहे. तसेच कोश्यारी पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे ४० आमदार असून हे सर्व बंडखोर गुवाहाटीमध्ये ठाण मांडून आहेत. दुसरीकडे शिवसेनेशी दगाबाजी केली म्हणत राज्यातील शिवसैनिक बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करत आहेत.

बंडखोर आमदार आणि त्यांच्या परिवाराची सुरक्षा काढण्यात आल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण देत कुणाचीही सुरक्षा काढण्यात आलेली नाही, असे नमूद केले होते. अशात राज्यपाल कोश्यारी यांनी आदेश दिल्याने पोलिसांची चांगलीच अडचण झाली आहे. पोलिसांची विशेष सुरक्षा असलेले मंत्री आणि आमदार दुसऱ्या राज्यात पोहोचेपर्यंत वरिष्ठ अधिकारी गाफिल कसे राहु शकतात, या मुद्द्यावरून आधीच पोलिस विभाग चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याच मुद्द्यावर उघड नाराजी व्यक्त केली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!