यवतमाळ : शिवसेनेतील ४० आमदारांनी घेतलेली भूमिका बंड नव्हे तर उठाव होता. ‘मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने आमच्यासाठी उघडले तर आम्ही सर्वजण परत जाऊ, असे खळबळजनक विधान शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर प्रथमच यवतमाळला आलेल्या आमदार संजय राठोड यांनी केले.
पक्षातील उठावानंतर सर्वांचाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘मातोश्री’वर परत येण्याचा विचार सुरू असताना, काही व्यक्तींच्या अनावश्यक बडबडीमुळे ते शक्य झाले नाही, असा आरोपही खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता राठोड यांनी केला. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचे आमदार संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री होते. पूजा चव्हाण या युवतीच्या मृत्यूप्रकरणात नाव आल्यामुळे राठोड यांना मंत्रिपद गमवावे लागले होते. त्यानंतर अनेकदा राठोड, त्यांच्या परिवाराने व बंजारा समाजातील शिष्टमंडळाने शिवसेना पक्षप्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘मातोश्री’वरून त्यांना योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झालेत.
“आम्ही आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहोत. मात्र महाविकास आघाडीत शिवसेनेवर कायम अन्याय झाला. शिंदे गटात गेलेल्या अनेक मंत्री, आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेतील व पक्षातील गळचेपीबद्दल वारंवार सांगूनही आमच्या समस्यांकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे आत्मसन्मानार्थ आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वासाठी व लोकहिताची कामे करण्यासाठी आम्हाला बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता,” असे राठोड म्हणाले.