Home » राष्ट्रपती मुर्मू यांच्यावर टीकेनंतर ईराणी, गांधी यांच्यात तुफान वाद

राष्ट्रपती मुर्मू यांच्यावर टीकेनंतर ईराणी, गांधी यांच्यात तुफान वाद

by नवस्वराज
0 comment

नवी दिल्ली : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासंबंधी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजप नेत्या स्मृती ईराणी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात लोकसभेत जबरदस्त वाद झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसहित इतर महिला खासदारांनी मध्यस्थी करत वाद मिटवला.

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी द्रौपदी मुर्मू यांचा ‘राष्ट्रपत्नी’ असा उल्लेख केल्याने भाजपा खासदारांकडून लोकसभेत निषेध करत घोषणा दिल्या जात होत्या. १२ वाजता सभागृह स्थगित करण्यात आल्यानंतरही भाजपा खासदार घोषणा देत सोनिया गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. गोंधळ सुरु असताना सोनिया गांधी भाजपा नेत्या रमादेवी यांच्याजवळ गेल्या आणि अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितली असल्याचं सांगितलं. “माझं नाव का घेतलं जात आहे?”, अशी विचारणाही त्यांनी केली.

सोनिया गांधी आणि रमादेवी यांच्यात संभाषण सुरू असताना स्मृती इराणी यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी नाही तर आपण नाव घेतले असल्याचे म्हटले. यावर सोनिया गांधी यांनी त्यांना ‘माझ्याशी बोलू नका’ असे सुनावले . यानतंर दोघींमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. तब्बल दोन ते तीन मिनिटे हा वाद सुरू होता. हा वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा, भाजपाचे प्रल्हाद जोशी आणि अर्जुन मेघवाल यांनी मध्यस्थी केली. काँग्रेसच्या खासदार गीता कोरा आणि ज्योत्स्ना महंत यांनी स्मृती इराणी तसंच भाजपाच्या काही पुरुष खासदारांना सोनिया गांधींशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!