नागपूर : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचे रणशिंग फुंकल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. बुधवारी (ता. 22 जून) दोन नेत्यांच्या बाबत चांगलीच चर्चा रंगली होती. विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे ते दोन नेते होत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फेसबुकवरून महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. त्यापूर्वी फडणवीस आणि ठाकरे या दोन्ही नेत्यांनी सोशल मिडीयावरील प्रोफाईल अपडेट केले. फडणवीस यांनी फेसबुक, ट्विटरसह सर्व सोशल माध्यमावरील प्रोफाईल फोटो बदलला. गोवा विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद निवडणुकील विजय आणि शिवसेनेला पडलेल्या भागदाडाचे यशस्वी स्मितहास्यातून दिसेल असा हा फोटो आहे.
दुसरीकडे चर्चा होती आदित्य ठाकरे यांच्या ट्विटरवरील स्टेटसची आदित्य यांनी आपल्या नावापुढील मंत्रिपदाचा उल्लेख हटविल्याची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात होती. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील आमदारांनी पुकारलेले बंड आणि खासदारांनी घेतलेली भूमिका यामुळे ठाकरे पितापुत्रांनी वस्तूस्तिथी स्वीकारल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.